Tuesday 24 May 2011

स्वर्गाची सहल

या दिवाळीत सहलीसाठी चक्क स्वर्गात जायचे असे ठरवले. त्या प्रमाणे एका दिवशी भल्या सकाळी निघालो. सातार्‍याच्या खिंडीतल्या गणपतीबाप्पा ला जाताजाता डावीकडे न वळता उजवीकडे सज्जन गडाकडे वळालो. सज्जन गड मागे टाकून चाळकेवाडी ला आलो.
येथे पवनचक्क्यांचे जंगल आहे. उसाच्या शेतात उभे रहावे तसे आम्ही पवनचक्क्यांच्या शेतात उभे होतो
pavanchakki
हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पठार. महाबळेश्वरच्या उंचीइतकेच.
इथला भन्नाट वारा आणि रानफुले. कास पठारासारखेच हे सुद्धा वॅली ऑफ फ्लॉवर्स आहे.
fule
इथे काही वनस्पती चक्क मांसाहारी आहेत. त्या किडे खातात. किडे फुलाना चिकटतात आणि तेथेच विरघळतात.
मी गेलो तेंव्हा फुलांचा बहर ओसरला होता.
पण काही म्हणा या सानुल्या गवतफुलांची ऐट काही औरच
fule2
येथून पुढे पठारावरून रस्ता नसलेल्या भागातून विचारत विचारत येड्यासारखे गाडी रेटत पुढे गेलो. हा रस्ता पुढे पाटणला उतरतो
पाटणहून पुढे चिपलूण रस्त्याला लागल्यावर पुढे कोयनानगर लागते. नेहरू गार्डनला उजव्या बाजूला ठेवत थोडे पुढे गेलो की मग विशाल शिवसागर सुरु होतो. तुमचे डोळे पोहोचतील तिकडे हिरव्या रंगाच्या लक्षावधी छटा दिसू लागतात.
green1
त्या सागरनिळ्या हिरव्या रंगाचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे
green2
कोयनानगरचा निसर्ग काहीही हातचे राखून ठेवत नाही. तो मुक्त हाताने उधळण करत असतो. आपल्या पिशवीतलीएकेक रत्ने उलगडून दाखवत असतो
green3
कुबेराने खजीना उघडावा त्यातला पाचूचा कप्पा आपल्याला देऊन टाकावा आणि चल घे ऐश कर म्हणावे तशा थाटात हा खजिना आपल्या पुढ्यात येत असतो.
kuber
कधी अवखळ बनून मस्ती करत तर कधी एकदम घनगंभीर होत ;
निसर्ग आपल्या समोर वेगवेगळ्या रुपात येतच रहातो.
green4
यातले कोणते रूप डोळ्यात साठवु आणि कोणते राखीव ठेवु हे ठरवताच येत नाही
खरच निसर्ग जे लिहितो ते गद्य पद्य अशा शब्दात मांडताच येत नाही . जे असते ते सर्व हृद्यच असते.
GADYA PADYA
आकाशाचा निळा गवताचा पिवळसर हिरवा. पालवीला आलेल्या फांदीचा तांबूस हिरवा. जुन्या पानाचा कच्च हिरवा. मधूनच पोपटी झाक मिरवणारी नवी पाने. अशी काही सरमिसळ होते की सांगता येत नाही
RANG
शिवसागराच्या आरस्पानी पाण्याच्या परिणामामुळे काही वेगळीच जादू होत असते
pani
हवेत इतका उत्साह असतो की त्यापुढे मध्यानीचा सूर्य सुद्धा शीतळ भासू लागतो
surya
बोट हळुहळु आपल्या कोयनेच्या जंगलाकडे नेत असते.
boat boat2
इथले काही जंगल हे मुद्दाम लावलेले आहे.
JANGLE4
उघड्याबोडक्या डोंगराना पहायची सवय असलेले डोळे .
त्याना ही मेजवानी च होती JANGLE2
ते जरा कमी घनदाट आहे. पण घनदाट म्हणजे नक्की काय हे इथे येऊनच पहावे
JANGLE JANGLE5
त्याहून पुढे वासोटा बाजूला गेले की नैसर्गीक जंगल पहायला मिळते. त्यासाठी बोटीने दोन तास प्रवास करावा लागतो.
या जंगलात बिबटे ,अस्वले, ससे, खारी ,कुत्री, तरस असे अनेक प्राणी आहेत. पण ते बहुतेकदा उन्हाळ्यात तलावाच्या काठाशी पाणी प्यायला आल्यावर पहायला मिळतात. जंगलात पाणी असताना प्राणी बाहेर फारसे पडतच नाहीत.
दूरचे हिरवे डोंगर, हिरवे लुसलुशीत गवत नितळ पाणी स्चच्छ आकाश प्रदुषण मुक्त हवा..परत जायला येथून पाय निघत नाही
आपण या चित्रमय निसर्गातलेच एक होऊन जातो.
DONGAR
पण नाईलाज असतो. अजून बरेच काही पहायचे बाकी असते.
kade
निसरडे कडे. अक्षरशः उभ्या चढणीचे डोंगर त्यातून अव्याहत कोसळणारे गडगडाटी धबधबे हे निसर्गाचे रौद्र रूप पाहून घाबरायला होते.
dhabadhaba
पण ते काहीसे आपल्या आजोबांसारखे ....... नातवाला अंगाखांद्यावर खेळवताना उग्र मिशाळ चेहेर्‍याच्या मागे कौतूक भरलेले असते.
dhabadhaba
परतीचे वेध लागलेले असतात. उन्हे उतरु लागलेली असतात. पण पाऊल निघत नाही. निसर्गावर दुपारच्या उन्हाने काही वेगळेच रंग चढवलेले असतातdupar
खरे तर इथून शहरात परत जायला आम्ही सर्वच नाखूष होतो. निसर्गसुद्धा या रे बसा रे जाल रे आत्ता आलात आन आत्ता लगेच कुठे निघालात असेच म्हणत असतो. तो आग्रह मोडवत नाही. पाऊल धबधब्यात थोडेसे विसावते.
dhabadhaba2

एक धागा सूखाचा

प्रेमचंदांची  एक कथा आहे. कधी काळ ऐकलेली...
दोन मित्र होते. दोघे ही अगदी गरीब . नोकरी नाही हाती पैसे नाहीत. काही काम मिळते का ते शोधत गावभर फिरायचे आणि रात्री जेवायला मिळाले तर जेवायचे अथवा पाणी पिऊन झोपायचे हा त्यांचा दिन क्रम
हिवाळ्या चे दिवस होते बरीच थंडी होती. दिवस भर वणवण फिरून काहीच काम मिळाले नव्हते नुसतीच पायपीट.
शिणलेल्या देहाला विश्रांती साठी झोपडीत आश्रय....
अशा स्तिथीत झोपडीच्या दाराला अडसर म्हणून लावलेली वीट वार्‍याने निघाली. दार थडाथडा आउअटू लागले.
बोचरी थंडी आणि वारा आत येऊ लागला...
पहिल्या मित्राने दुसर्‍याला सांगितले....
जरा दार बंद करतोस का.
दुसरा म्हणाला ...मी दमलोय वणवण भटकून. शिवाय सकाळपासून अन्नाचा कण नाही गेला पोटात.
"माझी काय वेगळी परिस्थिती आहे " पहिला म्हणाला " आपण दोघे ही बरोबर होतो की"
"पण मी आजारी आहे तू उठून दार लाव की"
"माझी पाठ गेलीय कामातून"
"माझ्या पायात गोळे आले आहेत"
दोघेही स्वतः किती शिणलोय हे सांगत होते. कोणाचेच पारडे खाली जात नव्हते.
" मी लहान पणी किती खस्ता खाल्या...... धाकट्या भावंडांचे सर्व मलाच करावे लागायचे. आईचे प्रेम कधी मिळालेच नाही"
"मी सुद्धा ते केलय सावत्र आईचा छळ सोसलाय"
दोघांच्या व्यथा सारख्याच होत्या.
शेवटी दोघानी ठरवले की ज्याने जास्त दु:खे भोगली असतील तो झोपेल आणि दुसरा उठून दार लावेल
" मी लहान पणी फार दु:ख भोगले आहे दारुड्या बापाचा पाठ मोडेस्तोवर मार खाल्लाय" पहिला म्हणाला.
"आणि मी सावत्र आईचा" दुसरा म्हणाला.
" मी जेवत असताना समोरचे ताट भिरकावून दिले होते बापाने. मारहाणीत त्याने माझा हात मोडला"
" सावत्र आईने मला तापल्या तव्याचे चटके दिले होते"
".....@#......."
"!!!......----"
दोघे ही मित्र आपापली दु:खे सांगत होते.
दोघांचीही दु:ख्खे तुल्यबळ होती. कोणीच हार जायला तयार नव्हते.
दोघानीही अगदी आठवत होते त्या वयापासून आठवत होती ती सगळी दु:खे उगाळून झाली.
पहिल्या मित्राला हळूहळु राग येऊ लागला.
बाकी काही नाही निदान इतरांपेक्षा आपल्या कडे अभिमान बाळगावा असे काहितरी होते तेच कोणीतरी हिरावून नेत आहे असे त्याला वाटू लागले.
रागाच्या तिरीमीरीत तो ऊठला त्याने दुसर्‍याला लाथाबुक्क्यानी बदडून काढले.
मित्राला मारताना संतापाने तो रडत होता. मारून मारून पहिला मित्र दमला. दुसरा अर्ध्या बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला आता माराच्या वेदनाच जाणवत नव्हत्या.
भान आल्यावर पहिल्या मित्राला दुसर्‍याची अवस्था जाणवली. तो खजील झाला. त्याने दुसर्‍याची माफी मागितली. त्याला कुठे लागलेखुपले आएह का ते पाहिले. त्याची पाठ चेपू लागला. दुसरा मित्र ग्लानीत क्षीण हसला.
पहिल्या मित्राला त्या अवस्थेत मित्राचे हसणे पाहून नवल वाटले.
"फार मारले नी मी तुला" पहिला खजील होत म्हणाला
" हरकत नाही ...तू संतापाने मारलेस्.........जाऊदेत. सूखे नव्हतीच कधी आयूष्यात. दु:खेच होती. तु प्रत्येक दु:खाच्या बाबतीत आप्ण समसमान होतो. पणआज मी त्या बाबतीत तुझ्यापेक्षा वरचढ ठरलोय. आपला काहीच दोष नसताना मित्राने; लाथाबुक्यानी मारल्याचे दु:ख मी तुला मिळू देणार नाही"

Saturday 21 May 2011

रूपक 1

एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे. आपल्या नातू पणतू खापरपणतू यानी आपली नाव अभिमानाने घ्यावे. आपल्या नावाने खानादानाला ओळखले जावे. त्या लोकानी मिशांवर ताव देत म्हणायला हवे की आमचे आजोबा पणजोबा खापरपणजोब इतके शूर होते इतके पराक्रमी होते.त्यानी भिंतीवर फ़ोटो मिरवायला हवे. पुतळे रोज हारानी मढवले जायला हवेत
झाले; माकडाने ते मनावरच घेतले.एखादी संधी मिळाली की झाले. शौर्य दाखवायला मिळायला हवे. मग बघतोच . माकड अशी एखादी संधी मिळते का पहायला एका उंच झाडावर जाऊन बसले.जंगलाचा सगळा परीसर त्या झाडावरुन दिसत होता.
एक संधी आणि आपले नाव सुवर्णाक्षरात......
माकड इकडे तिकडे पहात होते. तेवढ्यात त्याला एक सिंह; शिकार करून सावज खाऊन विश्रान्ती घेत झोपलेला दिसला. माकडाला आयती संधी मिळाली
झाडावरुन उतरुन ते तडक त्या झोपलेल्या सिंहाजवळ गेले. आणि माकडाने त्या झोपलेल्या सिंहाच्या कानाखाली एक जोरात वाजवली.
काहितरी करण्याच्या जोषात माकडाने सिंहाच्या कानाखाली वाजवली खरी पण नन्तर त्याला वस्तिस्थितीची जाणीव झाली. आपण काय करुन बसलो हे माकडाला जाणवले.त्याने ओळखले की आता आपले काही खरे नाही. हा सिंह; चिडलेला सिंह आपल्याला नक्कीच ठार मारणार.माकडाने तेथुन लगेच पळ काढला
सिंहाची झोप ताडकन उडाली त्याने डोळे उघडुन पाहीले. कानाशीलात काहितरी जोरात लागले हे त्याला कळाले. पळुन जाणा-या माकडाला पाहुन त्याला काय झाले हे त्याला कळाले. माकडाने सिंहाच्या ,जंगलच्या राजाच्या कानाखाली वाजवावी याचेच त्याला आश्चर्य वाटले.
क्षणभर माकडाच्या धाडसाचे कौतूक ही वाटले. पण मग नन्तर त्याने विचार केला की हे माकड जंगलात जाईल झाला प्रकार सर्वाना सांगेल.
मग जंगलच्या राजाची अब्रूच गेल्यासारखे होईल. कोणालाच आपले भय रहाणार नाही. या माकडाला आत्ताच मारुन टाकायला हवे.
सिंह माकडाला पकडण्यासाठी त्याचा पाठलाग करु लागला.
माकड पुढे पळु लागले सिंह त्याच्या मागे. माकड पुढे सिंह मागे. माकड पुढे सिंह मागे. आता काही आपण वाचत नाही असा विचार करुन माकड जंगलातून आणखी जोरात पळु लागले.
माकडाला मारुन टाकलेच पाहीजे असा विचार करुन सिंह तेवढ्याच जोरात माकडामागे धावु लागला. माकड वाट सापदेल तसे धावत होते सिंह त्याच्या मागे धावतच होताच माकड पुढे सिंह मागे आडवेतिडवे या झाडा आडुन जा त्या पाय वाटेने जा इकडुन तिकडून धाव जीव मुठीत धरुन माकड पळत होते. आणि माकडाला जिमन्त सोडायचे नाहीच हे ठरवुन सिंह त्याच्या मागे पळत होता.
इकडे तिकडे आडवे तिडवे पळुन पळुन माकड आता दमुन गेले होते. लपायला जागा शोधत होते. तेवढ्यात त्याला जंगलात वाटेवर पडलेले एक कसले तरी जुने वर्तमानपत्र सापदले. वर्तमान पत्र उघडुन त्याच्या आडोशाने माकड एका झाडाच्या बुन्ध्याला टेकुन बसले.
माकडाच्या मागेमागे असलेला सिंह तिथेही पोहोचलाच. त्याने पाहिले की कोणीतरी वर्तमानपत्र वाचत बसलेला आहे.आपण त्यालाच विचारु यात असा विचार करुन सिंहाने विचारले सुद्धा " दादा या बाजुने कोणी एखादे माकड जाताना पाहिले तुम्ही?"
या प्रशनाला उत्त्तर म्हणुन माकडाने वर्तमानपत्राआडुनच प्रतीप्रश्न केला " कोणते माकड ? तेच का; की ज्याने सिंहाच्या कानाखाली वाजवली ते?"
सिंहाला काही सुचेना तो खालमानेने परत फ़िरला. म्हणाला "ऒ ! तेवढ्यात पेपरात छापुनसुद्धा आले? संपलंच की सगळं"
ओशो रजनीशांची एक खासीयत आहे काही सांगताना ते विनोदाचा बरेचदा वापर करतात
एखादा विनोद सांगायचा आणि त्याचा रूपक म्हणुन वापर करून एखादा मर्मबोध करायचा.
ही त्यांची आवडती ष्टाईल.
ह्या विनोदाचा रूपक म्हणुन ते कसा सुंदर वापर करतील / ते कसा सांगतील बघा ...
अगोदर विनोद पूर्ण सांगतील आणि मग आधुन बधुन त्या विनोदातली वाक्ये घोळवत रहातील.
एक जंगलात एक माकड रहात होते.माकडाला एकदा वाटले की यदाकदाचित कधी जंगलाचा इतिहास लिहीला गेला तर आपले नाव सुवर्णाक्षरात लिहीले जावे.
आपण सुद्धा या माकडासारखे असतो. वर्तमानात जगायच्या ऐवजी आपण जेंव्हा या जगात नसू तेंव्हा लोक आपल्याबद्दल काय बोलतील याचा विचार करत असतो. काही उपयोग आहे का?
पण आपल्याला नेहमीच वाटते असते की आपले नाव सुवर्णाक्षरात लिहिले जावे म्हणून.
मग विचार करु लागतो........वर्तमानाच नाही तर भविष्यकाळाचा ज्यात आपण असणारसुद्धा नाही त्या भविष्याकाळाचा विचार. मन हे खूप अजब असते. वर्तमानाचाच आधार घेउन ते तुम्हाला इतरत्र रमवत असते. स्वत:चे जाळे विणत असते तुम्हाला त्यात अडकवत असते.
जरा ओळ्खा या मनाला.
म्हणते की काहितरी असे कर जे तुला शक्य नाही का तर लोकानी त्यासाठी तुझे नाव घ्यावे.त्याने तुला आत्ता काहीही मिळणार नाही. आणि जेंव्हा लोक नाव घेतील तेंव्हा ते ऐकायला तू असणार सुद्धा नाहीस.
आपण थोडेसे त्या सिंहासारखे असतो. झोपलेले.... स्वप्नात मग्न. वर्तमाना कडे पूर्ण पाठ फ़िरवुन..भूतकाळाच्या गतवैभवात रममाण होऊन झोपलेले असतो. वर्तमान नावाचे काही असते हे विसरुन स्वत:च्या साम्राज्यात रममाण असतो. एखादे माकड येते आपल्या कानाखाली देते. आपली स्वप्ने नगरी चक्काचूर होते स्वप्ने विखुरली जातात.. एखादे माकड आपली स्वप्नांची दुनिया उलटी करुन जाते. एखादा क्षुल्लक प्रसंग आपल्या ताळ्यावर आणुन ठेवतो.हवेत उडणारी पावले जमिनीवर टेकवतो.
आपल्याला राग येतो. ताळ्यावर आल्याच्या नव्हे ....तर आपण स्वप्नात होतो हे लोकाना समजले याचा
त्या क्षुल्लक कारणाच्या मागे आपण हात धुऊन पूर्ण शक्तिनिशी लागतो.
आणि तद्दन फ़ालतू का होईना ध्येय अगदी हातापाशी जवळ आलेले असताना एखाद्या किरकोळ कारणासाठी शेपुट फ़िरवुन माघार घेतो.
लोक काय म्हणतील या बाऊ ला घाबरुन आपल्याला जमत असलेले कामही अवघड करुन ठेवतो.
सिंहाने वर्तमानपत्र बाजूला करुन बघितले असते तर माकड सहज हाती लागले असते.
माकडाने वर्तमानपत्राआडुनच प्रतीप्रश्न केला " कोणते माकड ? तेच का; की ज्याने सिंहाच्या कानाखाली वाजवली ते?"
सिंहाला काही सुचेना तो परत फ़िरला म्हणाला "ऒ तेवढ्यात पेपरात छापुनसुद्धा आले? संपलंच की सगळं"
सत्य हे असेच असते. ते एखाद्या पातळ पडद्याआड दडलेले असते. आपण तो पडदा बाजूला करायचे कष्ट घेतच नाही.
कुणाच्या तरी एखाद्या क्षुल्लक शब्दाला महत्व देऊन "संपलंच की सगळं" म्हणत माघार घेतो. सत्य हे आपल्या समोरच असते. फ़क्त आपण त्या भोवतालचे लोकाचार , समाजमन , शिष्ठाचार , जात, धर्मग्रन्थ हे असले भ्रामक पडदे बाजूला सारत नाही. सत्य पडद्या आडच रहाते.आपण मात्र त्याच्या अगदी जवळ जाउन माघारी फ़िरलेलो असतो...... पराभूत होऊन.
:::::::स्वामी विजुभौ
( डीस्क्लेमर: प्रस्तूत रूपक हे ओशो रजनीशानी कधीही कोणत्याही व्याख्यानात सांगीतले नव्हते. हे लिखाण हे विजुभौंचे विचार आहेत.)

हॅट्स ऑफ टू लिलीयन

एखादे पुस्तक वाचल्यानन्तर त्यातील पात्रे आपल्याला भेटली तर किती बरे असे वाटत रहाते. आणि जर ते पुस्तक तुमच्या आवडत्या पुस्तकापैकी असेल तर मग विचारायलाच नको.
"चीपर बाय डझन" हे पुस्तक मी प्रथम किर्लोस्कर मासीकातुन तुकड्यातुकड्यात वाचले. मग नन्तर कधितरी ते आख्खे पुस्तक हातात लागले. आजतागायत त्याची पारायणे झाली तरी मनातुन अजून् सुटले नाही.
चीपर बाय डझन ही बारा भावन्डे आणि त्यांचे आईवडील यांची खरी कहाणी. त्या बारा भावंडांपैकी दोघानी सांगितलेली. आपल्याला आई वडीलानी कसे वाढवले; त्या सगळ्या गम्मती सांगतानाच पालकत्व कसे असावे हेही सांगणारी मस्त गोष्ट असे या पुस्तकाचे वर्णन करावे लागेल.
फ्रॅन्क गिल्ब्रेथ आणि लिलीयन मोलर ही दोघे टाईम ऍन्ड मोशन स्टडीचे कन्सल्टन्ट. त्याना बारा मुले होती. इन्डस्ट्रीयल कन्सल्टन्सी देताना करावे लागनारे सर्व प्राथमीक प्रयोग त्यानी आपल्या मुलांवर केले. यात गणीत शिकवण्यपासून ते भाषा शिकण्यापर्यन्त सर्व काही. मुलाना भाषा लवकर शिकता यावी तसेच मिळालेला प्रत्येक क्षण उपयोगात आणता यावा यासाठी मुले आंघोळ करताना भाषेच्या रेकॉर्ड्स लावुन ठेउन त्यांच्या कानावर भाषा पडावी किंवा झोपतानासुद्धा मुलाना सहजगत्या गणीताची सूत्रे डोळ्यासमोर दिसावीत म्हणून ती छतावर लिहुन ठेवणे यासारखे मजेदार उपाय त्यानी केले.
कारखान्यात हालचालींचे व्यवस्थापन शिकवताना सर्वात आळशी कामगार समोर ठेवा की तो कमीतकमी हालचालीत काम करतो असे भन्नाट पण उपयोगी युक्त्यांचा वापर करत.
बारा मुले घरात कशी एकमेकांची देखभाल करताना होणार्‍या गम्मती हा तर या पुस्तकाचा सर्वात धम्माल भाग.
शस्त्रक्रिया करताना सर्जनना स्वतःचावेळ वाचवता यावा म्हणून या गिल्ब्रेथ महाशयानी स्वतःवर शस्त्रक्रिया करतानाच्या फिल्म्स घेउन त्याचे ऍनालिसीस केले. तसेच दाढी करताना दोन्ही हातानी केल्यास १९ सेकन्द वेळ वाचतो असेही प्रयोग करुन पाहिले. प्रत्येक कामात हालचाली कमी वेळात करुन वेळ कसा वाचवता येईल याचे अनेक प्रयोग या पुस्तकात आहेत.
मुलाना श्रमाचे महत्त्व कळावे म्हणून घरातल्या घरातच कामांचे लीलाव ( सर्वात कमी बोली बोलेल त्याला काम )करायची पद्धत किंवा कामाची वाटणी यातुन घराचे व्यस्थापन असे अनेक प्रसंग यात आहेत.
एकदा त्याना कोणीतरी विचारले की इतका वेळ वाचवुन करायचे काय? गिल्ब्रेथ महोदयाने उत्तर दिले मिळालेले क्षन आनन्दात जगायचे.फ्रॅन्क गिल्ब्रेथने दुसर्‍या महायुद्धाच्या कालात अमेरेकन सैन्याला हालचालींचे व्यवस्थापन कसे करायचे तेही शिकवले.
फ्रॅन्क गिल्ब्रेथच्या मृत्यु च्या घटनेवर हे पुस्तक संपते. पण त्याचे वेगवेगळे प्रयोग मनातुन कधीच संपत नाहीत
हे पुस्तक वाचुन झाल्यावर मी कोठेतरी वाचले की त्या बारा मुलांची आई लिलीयनला अमेरीकेत १९४७ सालचे लेडी ऑफ द ईयर हे पारीतोषीक मिळाले.
जालावर शोध घेत असता या पुस्तकाच पुढचा भाग " बेलीज ऑन देअर टोज" ( पायांवरची पोटे) ही उपलब्ध आअहे तसेच चीपर बाय डझन च्या कहाणीवर अनेक चित्रपट होउन गेले आहेत.
बारा मुलंची आई असलेल्या लिलीयनचे पुढे काय झाले याचा जालावर शोध घेत असता या पुस्तकाच पुढचा भाग " बेलीज ऑन देअर टोज" ( पायांवरची पोटे) ही उपलब्ध आअहे तसेच चीपर बाय डझन च्या कहाणीवर अनेक चित्रपट होउन गेले आहेत.
बेलीज ओन देअर टोज मध्ये बाप नसताना त्यांच्या आईने सगळ्याना कसे साम्भाळले;आणि त्यावेळी करावा लागलेला संघर्ष याबद्दल लिहिले आहे.
फ्रॅन्क गेल्यावर लिलीयन ने त्याचा इन्डस्ट्रीयल कन्सल्तन्सीचा व्यवसाय संभाळला.
एखादी "स्त्री" इन्डस्ट्रीयल कन्सल्टन्सी करु शकेल यावर त्या काळच्या लोकांचा विष्वासच बसत नव्हता परिणिती कित्येक क्लायन्ट इतरत्र जाउ लागले. लिलीयनला आपणही कन्सल्टन्सी करु शकतो हे लोकाना पटवुन सांगावे लागायचे. एखादी स्त्री औद्योगीक सल्लागार असु शकते हे त्यावेळच्या अमेरीकन समाजाला पटतच नव्हते. लिलीयन ने तिची अनेक पुस्तके पती फ्रॅन्क गिलब्रेथ च्या नावावर लिहिले आहेत.
लिलीयनला तिच्या आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले.त्यात २० वेगवेगळ्या प्रकारच्या मानद पदव्या आहेत. १९२१ साली ती सोसायटी ऑफ इन्डस्ट्रीयल इंन्जेनीयर या संस्थेची पहिली महिला सभासद होती. फूट पेडल ट्रॅश कॅन आणि फ्रीज मधली कप्प्यांची दारे हे शोधही तिच्या नावावर आहेत. होममेकर ऍन्ड हर जॉब आणि लिव्हिन्ग विथ अवर चिल्ड्रेन ही दोन पुस्तके तिने केवळ गृहिणींसाठी स्वातन्त्र्य आणि जगण्याचा आनन्द कसा घ्यावा हे सांगत लिहिली. यात तिने घर ही एक आनन्दाची जागा आहे व्यक्तिमत्व खुलण्यासाठी आनन्दी घर गरजेचे आहे. आनन्दी घर राखण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी उचलली तरच हे शक्य होते हे ठामपणे मांडले. वयाच्या नव्वद वर्षापर्यन्त लिलीयन कार्यरत राहिली. वेगवेगळ्या कम्पन्यांमध्ये संशोधन करत वेगवेगळ्या विद्यापीठात लेक्चर्स देत तिने काम केले. २ जानेवारी १९७२ ला वयाच्या त्र्याण्णवाव्या वर्षी देहावसान झाले.
गृहिणी झाले की सम्पले चूल मूल हेच आपले करीयर न मानता स्वतःच्या बारा मुलांचे नीट संगोपनकरुनही लिलीयन अखंड कार्यरत राहिली. एक यशस्वी व्यक्ती म्हणून औद्योगीक जगाला तीची दखल घ्यायला लावली.
हॅट्स ऑफ टू लिलीयन गिल्ब्रेथ.

गुलमोहोर

गुलमोहोराचे प्रत्येकाचे नाते काही वेगळेच असते. आंबा चिंच यांसारख्या राकट आणि जटाधारी वडीलधारे वडपिंपळ यांच्या धीरगंभीर गर्दीत एखाद्या चॉकलेट हीरोसारखे एकदम तुकतुकीत दिसणारे हे देखणे झाड काही वेगळेच भासते.
या झाडाची मोहिनी मला कधी पडली माहीत नाही.... आमच्या सातार्‍याच्या न्यू इंग्लीश स्कूलच्या आवारात गुलमोहोराची बरीच झाडे आहेत.... शाळा सुरु होण्याच्या सुमारास गोलमोहोराच्या पाकळ्यांच्या शाळेत अक्षरशः पायघड्या घातल्यासारखा सडा असायचा..... त्या केशरी पिवळ्या पाकळ्यांची शोभा काही वेगळीच वाटायची.....
शाळेत जायचे म्हणजे गुलमोहोरला भेटायला जायचे हे डोक्यात इतके फिट्ट बसले आहे की.अजूनही एखाद्या रस्त्यावर फुललेला गुलमोहोर पाहीला की त्या कोपर्‍यावरून कोणीतरी वर्गशिक्षक येतील असेच वाटत.
golmohor2
त्या केसरी पाकळ्या पुस्तकात ठेवायचो...मग कधीतरी त्या पाकळीवरच्या रेशा न रेशा पुस्तकातल्या त्या पानावर उमटायच्या. पाकळीला एकदम कडक्क इस्त्री झालेली असायची पण त्याचा रेशमी स्पर्षाची जादू मात्र अजून टिकून असायची.
पुस्तकात ठेवलेल्या त्या पाकळ्यांमधून गुलमोहोर माझ्या कवितेत उतरला हे मला कळालेच नाही.... सांगलीच्या आमराईत भेटलेल्या गुलमोहोरावर केलेल्या एका कवितेने आपल्या कविता लोकाना आवडू शकतात..... त्या काव्यवाचन स्पर्धेत भरभरून दाद मिळवू शकतात हे जाणवले....तशी कविता मी आंब्याच्या किंवा पिंपळाच्या झाडावर लिहू शकलो नसतो.
सगळीच झाडे हिरवी असतात. पिंपळाच्या झाडाचा हिरवा रंग उगाच काहीतरी गूढ असल्याची जाणीव करून देतात.
जी एंच्या लिखाणाच्या प्रेमात होतो तेंव्हा उगाचच प्रत्येक कथा पिंपळाच्या झाडाखाली बसून वाचावी असे वाटायचे. आंब्याची ती हिरवी छटा उगाचच छापील शासकीय कागदाचा कोरदे पणा जाणवून देते.
पेरूच्या पानाची पोपटी छटा मोहवते पण पानाचा कठोरपणा लगेच दाखवते. निळ्या पांढर्‍या आकाशाच्या बॅकग्राउम्डवर नारळाच्या झावळ्यांचा हिरवेपणा थोडासा काळपटच वाटतो. एकदा चिनाराचे झाड पाहिले. त्याचा पसारा लक्षात येईपर्यन्त ते चिंचेचे झाडच वाटत होते..... त्याखालच्या बांधावर जर एखादी हिरवे नऊवारी कारभारीन उभी असती तर... कोल्हापुरात किंवा सातार्‍यात आहे असेच समजलो असतो चिंचेच्या हिरव्या तांबूस छटेत दात आंबवेल असा खट्यालपणा असतो. त्यात एक भारलेपणा असतो. चिंचेवर मुंजा रहातो......असे काहीतरी लहानापणी ऐकले होते...... पण मग आम्हाला दोन चिंचा खाल्या मुले होणारा खोकला त्याला का होत नाही...... किंवा पिंपळावरच्या मुंजाला खोकल्या मुळे हैराण होऊन झोप येत नसेल ना ......असे काहे प्रश्न विचारून पाठीत धपाटे खाल्याचा अनुभव गाठीशी होताच.
गुलमोहोराचे माझे नात एनक्की जुळले ते मला सांगता यायचे नाही पण ते मित्र सखा सुर्‍हूद या पलीकडचे होते. वक्त्याचे एखाद्या अलिप्ततेने ऐकणार्‍या एखाद्या जाणकार श्रोत्याचे असावे तसे.....
शाळेच्या सुट्टीच्या वेळेत गुलमोहोराखाली बसून मित्रांसोबत डबा खायचो.... गुलमोहोराच्या वाललेल्या शेंगानी शिवाजी औरंगजेब युद्ध खेलायचो... एकदम तरवारी चा फील देणार्‍या त्य शेंगा आम्हा प्रत्येकाच्या दप्तरात असायच्या... कधीतरी आईने दप्तर आवरले की त्याबद्दल जाब द्यावा लागत असे.
गुलमोहराचा बुंधा हा आमचा खेळताना दप्तरे ठेवण्याचा हक्काचा भोज्जा असायचा... तोच कधीतरी क्रिकेटचा ष्टंप व्हायचा . तर कधीतरी खोखो चा खांब व्हायचा.
पाकळ्यांचा लालसर तपकिरी पायघड्या घातल्यागत सडा असायचाच त्यामुळे गुलमोहोराखाली कोणी खेळताना पडले आणि त्याला खरचटले असे कधीच झाले नाही.
का कोणास ठाऊक झाडाना जर बोलता आले असते तर आंबा वगैरे झाडे ही तुमची विचारपूस करताना काय भो कस काय लै दिवसानी दिस्लात यंदा मुक्काम हाय ना....आपल्या बांधावरल्या झाडाला यंदा झक्कास मोहोर आलाय्....रायवळ हाय पन एकडावा हातावर पिळला की साकर एक्दम जणू..... अशी विचारपूस करतील....... हिरवीगार चिंच म्हणेल बसा जरा दमला असाल.... थंड व्हा... का घाई करताय जायची. अशी भाबडी नाते जपणूक करतील असे वाटते. गुलमोहोर थोडासा अलीप्त ...पण प्रेमळ विचारपूस करेल.... तुमच्यावर पाकळ्यांचा वर्षाव करेल्..पण जाताय म्हणालात तर थोडे थांबला असतात तर बरे झाले असते वगैरे न बोलता.... आता तुम्हाला पाच ची एस्टी मिळेल..... नाक्यावर रीक्षा असेलच असही म्हणेल.... असेच वाटते
एवढी विचित्र वाटणारी कोकणस्थी अलिप्तता सोडली तर नाते संबन्ध जोडायला गुलमोहोर हा सर्वात मस्त.......
कडकडीत उन्हात स्वतःसोब्त तुम्हालाही फुलवणारा.
गुलमोहोराच्या झाडाचा प्रॉडक्टव्हिटी नावाच्या गद्य प्रकाराशी काहीही संबन्ध नसतो. त्याची फुले कोणी देवाला वाहिल्याचे पहाण्यात काय ऐकण्यात सुद्धा नाही शुभेच्छाबुके सारखी खास जरबेरा ऑर्चीड्स गुलाबाचा नखरा असलेली राखीव जागा गुलमोहोराच्या नशीबात नसते. हे असले बंदिस्त होऊन खुलत बसणे गुलमोहोराला मानवतच नाही
म्हणूनच की काय गुलमोहोराला फुलायला ऐसपैस आभाळाभर जागा मिळते... निळ्या पांढर्‍या आकाशाच्या बॅकड्रॉप वर गुलमोहोर एखाद्या मुक्तहस्त चित्राप्रमाणे कलंदर पणे खुलतो.
jhad1
फांद्यांचा आटोपशीर पसारा डहाळीची नव्हाळी सदोदीत तुकतुकीत असते... पानांचा मंत्रचळ लावणारा रेखीव पिसारा.... आणि त्याच्या मोरपिसाच्या आकाराच्या पाकळ्या .... हे सगळे इतके आखीव रेखीव असते की एखाद्या आईने तिच्या सात आठ वर्षाच्या मुलाला न्हाऊ घालून नीट भांग वगैरे पाडून ठेवलाय्.आणि ते मूलदेखील अगदी पाटावर देवासारखे बसलय असेच वाटतय.
गुलमोहोराच्या झाडाचा हा रेखीवपणा सदैव जाणवत असतो....
हे झाड भारतीय नाहिय्ये.... मादागास्कर बेटावरून कधीतरी कोणीतरी हे झाड इथे आणले....... आणि वड पिंपळ बाभळ उंबर ही खडखडीत नाव कुठे गुलमोहोर हे नजाकतदार नाव. तशीच नजाकत पानांच्या रचनेत ही. एकदम आखीव रेखीव........ पिंपळासारखी वळणदार वेलबुट्टी नसेल पण फारशी आकर्षकक नसलेली पाने रेखीवपणे मांडली तर जे भौमितीक सौंदर्य जाणवते त्याला तोड नाही
pane
पण जाऊ दे ना.... एकदा असेच कोणीतरी म्हणाले की सौंदर्य ही केवळ बाह्य गोष्ट नव्हे..... वरवरची नव्हे ........ सौंदर्य हे अंतरंगात असते......... त्यावर दुसरा उत्तरला हो बरोबर आहे तुझे.. सुंदर स्त्रीचे र्‍हदय सुंदर असते. एवढेच काय तीचे यकृत ,प्लीहा लहान आतडे सुद्धा सुंदर असते.........
जाउ दे. इतकी चिरफाड कशाला करायला हवी.
गुलमोहोर जगात बहुतेक देशात आढळतो... उष्ण, समशीतोष्ण कटीबंधात तर हमखास...
असो.......
एखाद्या कौलारू घराशेजारच्या गुलमोरामुळे घराचे सौंदर्य कितीतरी पटीने वाढते. का कोणास ठाऊक ते घर एकदम आपलेसे वाटू लागते. गुलमोहोराच्या झाडाची सावली वड चिंच पिंपळासारखी डेरेदार नाही. पण पानापानांच्या नक्षीतून झिरपत जाणारा तो उन पावसाचा खेळ भर उन्हातही एक वेगळाच अनुभव देतात
शाळेत असताना आम्ही अजून एक खेळ खेळायचो....... गुलमोहोराच्या पाकळ्यां नखाला लावायच्या... बरोब्बर पाच पाकळ्याचे फूल आणि त्यातही गम्मत म्हणजे एकच पाकळी वेगळ्या रंगाची...... आणि मधोमध असलेला तो तुरा
tura
ती मधोमध असणारी पांढरी ठीपकेवाली पाकळी चवीला किंचीत आंबट लागते
pakli
हे सुद्धा गुलमोहोरच करू जाणे.... एकच पाकळी वेगळी.......
गुलमोहोराच्या झाडाचा अयूर्वेदात काय उपयोग आहे हे मला माहीत नाही.... बहुधा काही फारसा महत्वाचा नसेल.........
या झाडाला फारशी सावली नाही.... त्याची फळे फारशी उपयोगी नाहीत्....त्याची पाने फारशी उपयोगी नाहीत..... कचराच जास्त होतो... फांद्या /लाकूड फारसे उपयोगी नाही तरिही रॉयल पॉईन्शियाना म्हणजे गुलमोहोर जगातल्या पहिल्या पाच देखण्या झाडांत गणला जातो... तो जगभर वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. फ्लॅम्बॉयन्ट ट्री , मोराच्या फुलांचे झाड झाड , जंगलातली आग .......
आश्चर्य वाटते असे नक्की काय आहे की जे इतर झाडांत नाही आणि गुलमोहोरात आहे...... बहुधा लोकांच्या मनाशी सलगी करण्याची जादू..... ती तर नावापासूनच आहे... गुलमोहोर म्हणले की उगाचच ती उर्दू शायरी आठवते.... ताजमहालावर॑ची फार्सी वेलबुट्टी आठवते.
प्रत्येक सर्‍हदय माणसाचे गुलमोहोराचे एक अनामिक नाते असते.... नसेना का गुलमोहोराचे झाड फारसे उपयोगी........ नसतो का आपला एखादा मित्र्...फारसा उपयोगी न पडणारा.... थोडासा फटकून रहाणारा ...स्वतःला शिष्ठ समजणारा. पण त्याच्याशी आपली मैत्री कायम रहाते....
एखाद्या हळव्या क्षणी या मित्राने आपल्याला हवा असलेला तो कसलासा खांदा देऊ केलेला असतो...........
गुलमोहोराचे तसेच काहीसे आहे......... माझे गुलमोहोराचे नाते काय आहे कोण जाणे पण आहे हे नक्की......
शाळेत असताना वाड्यात रहायचो........... तिथेही भरपूर झाडे होती..पण गुलमोहोर नव्हता जेंव्हा वडीलानी घर बांधले तेंव्हा झाडे कोणती लावायची हे विचारल्यावर प्रत्येकाने गुलमोहोराचेच नाव घेतले...... त्या नन्तर आंब्या फणसाचे
गुलमोहोराच्या झाडाची आणखी एक गम्मत लक्षात आली का......... पिंपळावर मुंजा ...ब्रम्हसम्नध असतो..... चिंचेवर खवीस असतो... वडाच्या झुलणार्‍या पारंब्यावर हडळ असते....... बाभळीसारख्या काटेरी झाडावर सुद्धा झुटिंग असतो....... पेरूच्या झाडावर चेटकीण असते... नारळाच्या झाडावर पिसे की कायसे असते................ ही सगळी झाडे आमची हक्काची खेळण्याची झाडे....... पण रात्रीची शिफ्ट ही या मंडळीनी वाटून घेतलेली असते....
चिंचेचे झाड तर रात्री भितीदाय्क वाटते......... दुपारी काहीतरी आर्या वगैरे सांगणारी पिंपळाची सळसळ रात्री काही वेगळीच भाषा बोलत असते....
आमच्या घराशेजारच्या गुलमोहराच्या फांद्या रात्री वार्‍यानी कर्र कर्र वाजायच्या.....पण ती कर्र कर्र कधीच भीतीदायक वाटायची नाही......... उलट "आहे रे मी सोबतीला ..."अशीच काहिशी असायची.
उंबराच्या झाडाखाली दत्ताचे जागृत देवस्थान असते.... पिंपळाखाली शनी मारुती.... चिंचेशेजारी गणपती अशी देवानीही झाडे वाटून घेतलेली असतात.
गुलमोहोराचे झाड मात्र या सगळ्यापासून अलीप्त असते.......... जणु ते सांगत असते तुम्ही कोणत्या का देवाला भजत असाल...... मी तुमचा खीसा हलका करणार नाही ....तुमच्याशी गूज गोष्टी करेन........ मनावरचा ताण मात्र निष्चीतच हलका करेन.
jhad
आमच्या सातार्‍याला एक रस्ता आहे फारसा रहदारीचा नाही... मात्र नव्या धाटणीची स्वतन्त्र घरे असलेला आहे... एक दोन हॉस्पीटल..एक शाळा.... दुकाने वगैरे जवळजव़ळ नाहीतच असा........ अगदी निनावी.... केंव्हा कोण जाणे कोणाच्या तरी लक्षात आले की त्या दोन अडीच किलोमीटर्च्या रस्त्यावर गुलमोहोराची १०० पेक्षा जास्त झाडे आहेत...... लोकानी स्वतः होऊनच त्या रस्त्याचे नामकरण केले "गुलमोहोर पथ"
ते नाव आपोआप लोकांच्या तोंडी रुळले...
मग तेथे संध्याकाळी पायी फिरायला जाणारी मंडळी वाढली.....
तेथे हमखास दरवर्षी गुलमोहोर दिन साजरा केला जातो......... त्या निमित्ताने लोक एकत्र येतात....चित्रांचे प्रदर्शन ..काव्य संध्या वगैरे साजरे होतात...... ... विषय अर्थातच गुलमोहोर हाच असतो.
चित्रे कविता बहुधा रोमॅन्टीकच असतात. जणु गुलमोहोराला दु:ख ,भूक, इतर विषयांचे वावडे असावे...
हे मी बोलूनही दाखवले....की गुलमोहोराला फक्त प्रेमकवितेतच स्थान का दिलय....
त्या गुलमोहोर डे ला एकजण काव्यवाचनात एक जण त्याची कविता वाचत होता...
"पहाटे तुझ्या कुशीतून .....गुलमोहोराला पहावं"
शेजारी बसलेले मधूसूदन पत्की हळूच पुटपुटले... "वाटलं तर मोहोरावं नाहीतर गुल व्हावं"
कसे कोण जाणे पण हे पुटपुटणं सगळ्याना ऐकू गेलं..... गुलमोहराच्या दालनात विनोदाची भर टाकून गेलं

र्‍हदयी वसंत फुलताना

खरे तर वसंत यायला अजून पुष्कळ अवकाश आहे.
त्यावेळे असते तशी फळांची रेलचेल इतर कोणत्याच काळात नसते
हिरव्या पट्ट्याची पण आतून लालभडक असणी कलिंगडे.
मस्त मखमली बसंती/अबोली रंगाची खरबूजे
फिक्कट पिवळ्या रंगाचे अननसाचे काप
हिरव्या गार कैर्‍या
काल एके ठीकाणी फळांची रास पाहिली.
नीट रचून ठेवलेली. रंगीत फळे होते.
धम्मक केशरी रंगाची संत्री
पिवळी जर्द केळी
फिकट गुलाबी लालसर सफरचंदे
लालभडक सफरचंदे
हिरवी टप्पोरी द्राक्षे
फिक्के पोपटी आवळे
मातकट चिक्कू
लालभडक डाळिंबे
जणू काही जमिनीवर असलेले इंद्रधनुष्यच होते.
फळांचा आस्वाद जीव्हेने घेण्यागोदर तो डोळ्यानी घेतला जातो.
तो आस्वाद घेताना डोळे निवत नाहीत तर तोंडाला पाणी आणतात. पोटातला वडवानल पेटवतात.पंचेंद्रीये जागवतात
ही न्यारी किमया आपोआप घडते. कोणी ठरवून करायची म्हंटली तरी करता येणार नाही.
एखाद्या रमणीची बोटे चवळी सारखी नाजूक असतात.
हात काकडी सारखे नितळ असतात.
ओठ संत्र्याच्या फोडी सारखे असतात
गाल सफरचंदासारखे गुलाबी असतात
डोळे बदामासारखे असतात.
स्वभाव तेज तर्रार मिर्ची सारखा असतो.
कुंदकळ्या सारख्या दंतपंक्ती असतात.
त्या रमणीचे हे सारे गुण प्रेमात पडल्यावर जास्त जाणवतात.
म्हणूनच की काय कोण जाणे प्रेमात पडण्याला र्‍हदयी वसंत फुलणे म्हणत असावेत.

ए देवबप्पा

ए देवबप्पा
ऐकू येते का रे काही तुला
त्या आरतीच्या गोंगाटात
टाळ्या अन झांजेच्या खणखणाटात
लोक काय काय मागत असतात
अन गार्‍हाणी सांगत असतात
कुणाला काय हवे असते
रुपं देही धनं देही
पुत्रं देही सर्व कामांशा देही मे
गात असतात किती ते तुझे गोडवे
अन म्हणतात की जो गाईल ही आरती
मिळेल त्याला सर्व हवे ते
पण खरे सांग एकदा
खरेच ऐकु येते का रे तुला?
सांग ना.....
ए देवबप्पा
दिसते कारे काही तुला
गाभार्‍याच्या बाहेरचे
त्या चिमुकल्या दाराच्या फटीतून
किंवा त्या जाळीच्या दरवाजाच्या पलीकडचे
त्या रोषणाईच्या झगमगटात?
किती डोळे लागलेले असतात
आशेचे डोहाळे घेऊन आलेले असतात
ताटकळत उभे असतात दर्शनासाठी
तुझ्यावर केलेल्या रोषणाईने
खरेच दिसते का रे काही तुला?
सांग ना...
ए देवबप्पा
वास तरी येतो का कसला
उदबत्ती धुरात आणि अत्तराच्या घमघमाटात?
मला खात्री आहे नैवेद्याच्या सुद्धा
तुला कधी वासच येत नसेल
इतक्या आशेने लोक येतात
पेढे बर्फी लाडू अन अन काय काय ती पंचपक्वान्ने घेऊन
कंटाळलाही असशील रोज रोज तेच तेच खाऊन
दाराबाहेरची ही....गर्दी पाहून
तुलाच भीती वाट असेल बाहेर येण्याची
चेंगरून जाऊ भक्तांच्या दाटीत;
किंवा गाभार्‍या पाशी नेणार्‍या लांबलचक रांगेची.
दक्षीणा दिली नाही तर पुजारी आत येऊच देणार नाही अशीही
किंवा मग बाहेर आलो तर पहावे लागेल
ते ते सारे जे आतून दिसत नाही
ते ते सारे जे आतून ऐकू येत नाही
आणि ते जे आतून कधीच जाणवत नाही
धक्केच बसतील ...
देवळापुढचे कचर्‍याचे ढीग पाहून
नारळाची कवचले , खरकट्या पत्रावळ्या , भिकार्‍यांचे थवे
डिस्को भक्तीगीतांचा गोंगाट.....
अजून थोडा पुढे आलास तर....
................ नको तू पळूनच जाशील इथून
त्या पेक्षा आहेस तिथेच बरा आहेस
निदान तुझ्या नावामुळे
गावातली बाजारपेठ फुलून जाते दर गुरवारी
एवढे तरी समाधान असू दे त्या गावकर्‍यांसाठी
साखर फुटाणे विकणार्‍या कमळीसाठी
गुलाल नारळ पेढे विकणार्‍या कोण्या म्हमद्या साठी
लैला बनून देह विकणार्‍या कोण्या चिंगीसाठी
.................विजुभाऊ

तीचे डोळे

" रोखूनी मजला पाहू नका डोळे हे जुल्मी गडे कशीदा मी काढु कशी " असे काहीसे गाणे कधीतरी रेडीओवर ऐकले होते.
ते वय गाणी ऐकून मोहरायचे नव्हते. मग कुठल्यातरी वयात तसे डोळे पाहिले किंचीत पिंगट.... पाणीदार... आणि एखाद्या छान चित्राला फ्रेम असावी अन त्या फ्रेममुळे चित्राला आणखीनच शोभा यावी किंवा सुंदर खडा कोंदणामुळे आणखीनच तसे काजळाच्या फ्रेममध्ये दिसणारे ते डोळे मला अचानक काहीतरी वेगळीच जाणीव देवून गेले.
ती पहिली नजर पुन्हा कधी अनुभवता येणे केवळ अशक्यच. ज्याने अनुभवली त्यालाच हे कळाते. देव भेटल्यापेक्षाही त्या क्षणात काहीतरी जादूभरे असते. एखाद्या चेहेर्‍यात नक्की काय जादू असते ते त्या नजरेलाच ठाऊक. टप्पोरे पाणीदार डोळे..काजळाच्या रेखीव फ्रेममधले.... आणि चेहर्‍याला जुल्फांची महीरप..... बोलके डोळे तुमच्या र्‍हदयातील बोल बोलत असतात.
एक नजर हा जादूभरा अनुभव प्रत्येकाने कधीनाकधी अनुभवला असतो. त्यामुळेच की काय प्रेमाची सर्वात जास्त गाणी डोळ्यांवरच लिहीली गेली असावीत .
प्रियकरासाठी प्रेयसीचे डोळे हे एक आटपाट नगर असते. त्यात स्वप्ने नांदतात. त्यात तो असतो ती असते आणि दोघांसाठी एक मोकळे निरभ्र चांदणं भरले आकाश असते. त्यात चांदण्या गाणे म्हणत असतात. चंद्राच्या चंदेरीप्रकाशात न्हाऊन ती परी झालेले असते. तिथे वचने खरी होऊन अवतरतात. स्वप्नभरल्या रस्त्यातून चालताना पायांच्या खाली नोकरी, पगार, स्वयंपाक ,मुले ,नातेवाईक असले खडे खड्डे खाचखळगे येत नाहीत. अगदी हवेतून चालत जाता येते.
भणंगातल्या भणंगाला सुद्धा स्वप्नांची ही श्रीमन्ती त्या नजरेमुळेच मिळते.
आसपासचे सगळे जग जणु आपलीच खबर घेत आहे असे काहीसे भास होतात. किराणा दुकानदार सुद्धा किराणाचे गहू हातात देताना अस्फुट हसतोय असे वाटू लागते.
रस्तातून जाताना कधी त्या डोळ्यांची मालकीण भेटली तर देशाची साम्राज्ञी भेटल्याचा आनन्द होतो. ती साम्राज्ञी दिसताच भरगर्दीचा रस्ता सुद्धा फुलाफुलंची बाग भासू लागतो.
कोण्या शायराने प्रेयसीच्या डोळ्याना सरोवाराची उपमा दिली आहे
पलको पर न रख्खो हमे. आखोंमे उतरने दो
किनारे से गहराई का अंदाजा नही आता.
डोळ्यांची भाषा ही इन्क्रीप्तेड असते. ती ज्याच्या साठी असते त्यालाच कळते. न बोलताही डोळे बरेच काही बोलून जातात.
लटका राग दाखवतात ते डोळेच ,पाहूनही न पाहील्यासारखे करतात ते डोळेच आणि त्याने आपल्याकडे पाहिले आहे का हे चोरून बघणारे असतात ते डोळेच. तीला चोरून पहील्याची चोरी देखील डोळेच पकडतात. आणी चोरी पकडल्यानंतर गालाअगोदर आरक्त होतात ते डोळेच.
तीचे डोळे.. हल्ली मला काही सांगत असतात.
न बोलताताच बरेच काही बोलत असतात
भर उन्हातदेखील लिंबोणीची सावली देत असतात
तीचे डोळे ..माझ्या नकळत मला पहात असतात.
मी येणार असे ऐकल्याबरोबर माझ्यासाठी वाटेवर इंद्रधनुष्य बनून रहातात

सार काही क्षम्य असतं

म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सार काही क्षम्य असतं
पण प्रेमात पडतानाचा क्षण अनुभवणं.......
हे इतके रम्य असते की
त्यापुढे तू दिसावीस म्हणुन ;
क्लासला दांडी मारुन माझं बसस्टॊप वर
विनाकारण उभे रहाणं क्षम्य असतं
त्यामुळे परिक्षेची एक दोन युद्ध हरणं ही क्षम्य असतं.........
माझं ताटकळतं तुझी वाट पहात असणं...तुझं येणं...
आल्यावर डोळ्याच्या कोपर्‍यातुन
मी किती रागावलोय ;
याचा अंदाज घेणं.....
तुझं हे असं पहाणं......
हे इतके रम्य असतं की
त्यापुढे तुझं मला तासभर उन्हात ताटकळवणंही क्षम्य असतं.......
मला उमजत असतात तुझी ती खोटी आर्जवं..
तुझे ते कसलेही बहाणे....
पण तुझं ते ओठांचा चम्बु करुन मान हलवत बोलणं
अन मानेच्या हालचाली बरोबर
ते कानातल्या लोलकांचे डुलणं .....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे उशीर झाल्याची शंभर कारणं सांगणही क्षम्य असतं.......
वार्‍यामुळे अवखळुन केसांचं
तुझ्या गालांवर रुंजी घालणं......
तू त्याना डाव्या हाताने कानामागे दडवणं.....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे मी तुझ्यावर रागावण्याचं कारणच विसरणंही क्षम्य असतं.......
माझं अधांतरी जगत स्वप्नं रंगवणं....
त्या स्वप्नांना तू जमिनीवर आणणं...
आणि मी कावराबावरा असताना तुझं मला स्पर्ष करणं....
त्या स्पर्षाचा निरागसपणा अनुभवणं......
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे हजार चिंतांचा भार वाहणंही क्षम्य असतं.......
कधी कातरवेळी.... संध्याकाळी .....
आठवणी जागवुन हे सगळे क्षण
पुन्हा अनुभवणं... जगणं....
हे इतकं रम्य असतं की
त्यापुढे डोळ्यातुन पाण्याच्या धारा लागणंही क्षम्य असतं.......