Wednesday 14 September 2011

धूपगंध

किती दिवस झाले आपण आपल्याला पाहून.
मला वाटते एक दोन महीने झाले असतील.
या पाय हल्ली थकलेत. डोळे दमलेत. आणि आरशात काय पहाणार तोंडाचे बोलके....
अन कुणाला आहे कौतूक त्या थोबाडाचे. दाढीचे खुंट , आत गेलेली गालफाडे , अन फिकुटलेले डोळे!
हम..वय झालं असं म्हणायलाच हवं.
आबा स्वतःशीच बोलत असतात. एकलेपणा त्याना खायला उठतो. भिरभिर फिरत असुनसुद्धा खोलीतला हॉस्पीटलचा वास काही कमी होत नाही. घरातल्या घरात असूनही औषधे ,काढे, इंजेक्षने यामुळे घरात हॉस्पीटलच झाले होते.
खरच आपण थकलोय...आपले वय झालय.....
पण शरीर थकले म्हणून वय झालं? आपला आवाज तर खणखणीत आहे. तो तरी तसा आहे हे कशावरून?
गायला जमेल? काळी दोन चा आवाज उतरून एखादी पट्टी उतरला असेल.
गाण्याच्या आठवणीने आबाना काहीतरी वेगळे वाटले. अंगात उगाचच वीज चमकून गेल्यासारखे झाले.
अंग अंग मोहोरून आले.
आबानी टेबलाकडे पाहीले. मघाशी शंभूनाथने त्यांची जुनी ट्रंक लॉफ्टवरून काढून तिथे ठेवली होती.
त्याला पितळी कुलूप तसेच होते.औरंगाबादच्या प्रयोगाला ती मिळाली होती ती ट्रंक. कोण्या अनामीक चाहत्याने दिली होती.
आबानी आपले थरथरते हात ट्रंकेवरुन , कुलुपावरून मायेने फिरवले. कुलुपाला थोडेसे ओढले असेल खटकन उघडले. उघडेच असेल कदाचित.
कर्र आवाज करत ट्रंकचे झाकण उघडले. ट्रंकेतून येणार्‍या शालूच्या वासाने आबा एकदम वेगळ्याच काळात गेले.
ट्रंक उघडली आतील जुनात शालूवरून आबानी हात फिरवला. मन एकदम मोरपिशी हसले.
त्यांच्या मनात अचानक वेगळाच काळ जागा झाला.
प्रेक्षकगृहात लोकांची लगबग सुरू झाली. सुरंगीच्या वेण्या , नवे कोरे शालु , पैठण्या , केवड्याची ,गुलाबाची अत्तरे , चंदनाची पावडरचा ,मोगर्‍याचे गजरे या सर्वांचा एकत्रीत वास येवू लागला.
सोडेवाले लेमनवाले यांचे आवाज येवू लागले.संध्याकाळी प्रेक्षकगृहात शिंपडलेल्या पाण्याने मातीचा सुगंध वातावरणात आणखीच रंग भरत होता.
बांगड्यांची किणकीण , एखाद्या कोपर्‍यातून येणारी हास्याची नाजूक लकेर , दबक्या आवाजातील कुजबूज ..........घणघण घणघण ...घंटेच्या एका आवाजाने हे सगळे आवाज शांत होऊ लागतात.
आवाज कमी होउ लागले तसे प्रेक्षकगृह जिवंत होऊ लागते.वातावर एका अनामिक उत्कंठेने भरुन जाते.
लोक डोळ्यात प्राण आणून पडद्याकडे पाहू लागतात.
पडद्यामागची हालचाल जाणवू लागते.पडद्यामागचे आवाज ऐकून अंदाज बांधायचा प्रयत्न करू लागतात
सागळी गात्रे आतूर होऊन नटाची वाट पहात असतात. त्या मखमली पडद्यामागे एक वेगळीच दुनीया जिवंत होत असते.
इकडे धुपाचा गंध उत्कंठा वाढवत असतो. शालू ,शेले यांची येजा आता थोडी निवत असते. आर्गनवाले तबले वाले ठाठोक करून हत्यारे लावत असतात,
पडद्यामागे हालचाल होते. घणणणणण घंटा निनादते. माईक जिवंत होतो
आर्गनचे सूर बोलू लागतात. घर्रर्रर्रर्रर्र आवाजासरशी पडदा वर जातो.
रंगमंचावर सगळी पात्रे समोर हात जोडून उभी असतात
आणि खणखणीत आवाजात नांदी सुरू होते.
" नमन नटवरा विस्मयकारा.... "