Wednesday 27 April 2011

एप्रील फळ ७


मोघमपणे बोलायचे झाले तर एप्रिल महीना भारतिय कालगणने नुसार चैत्रा चा महीना .वर्षाचा पहीला महीना. नवे वर्ष तुम्हाला आरोग्याचे जावो असे केवळ म्हणुन निसर्ग थांबत नाही तर त्याच्या खजिन्यातली एकसे एक बढकर रत्ने तुम्हाला पेष करतो. नवीन कोवळी पालवी फुटली झाडे , फुलानी बहरलेले गुलमोहोर , जॅकरन्डा , बहावा, बकुळ , शिरिष , मोगरा ,बोगन वेल , लॅबर्नम , लाल ,केशरी , निळा, सोनेरी , हिरवट पांढरा रंगांची , गंधांची रेलचेल असते.
रस्त्याने जाताना गुलमोहराचे सडे पाहुन आपले वर्ष खरेच आनन्दाचे जाणार याची खात्रीच पटते.
असेच रमत गमत जात असलो तर मधेच एखादे फलांचे दुकान लक्ष्य वेधुन घेते. केवळ हारीने मांडलेली फळे हीच काय ती सजावट . रंगपंचमीच्या वेळी रंगानी नटलेले दुकाना असवे इतक्या विविध रंगांनी फळानी दुकान सजलेले असते.
हिरव्या पिवळ्या मोसंब्या , काळ्सर शेवाळी हिरवे कलींगड , पिवळे धमक आंबे , हिरवी गार द्राक्षे ,सोनेरी खरबूज , अन्जीरी गुलाबी अन्जीर , पांढर्यावर हिरवे पट्टे असलेली साखर काकडी .खाकी रंगाचे चिक्कू , आंब्याशी स्पर्धा करणारी पपई,लालभडक स्ट्रॉबेरी , जांभळे ,तुत्तु, रायण्या ,आंबोळया वगैरे माकड मेवा अजून यायचा असतो.या सार्या फळांच्या सोबत बसलेला फळवाल्याचा कळकट छोटा मुलगा सुद्धा या रंगसंगती मध्ये शोभुन दिसतो
ही सगळे फळे म्हणजे सम्राटांच्या दरबारातले मानकरी. सम्राटाला साजेल अशाच वेशात असतात. प्रत्येकाचा थाट काही औरच.
द्राक्षाचा बहर संपत आलेला असतो. मोत्यांची रास रचावी तशी द्रक्षांच्या घडाची रास पाहीली की आपण गर्भश्रीमन्त असल्यासरखे वाटु लागते,हिरवे गार द्रक्षाचे मणे, मधेच्य एखाद्या मण्यावर उन्हाने आलेली तांबुस झाक पाहीली की उन्हातुन चालल्यामुळे गोर्यापान युवतीच्या गालावर आलेली लाली आठवते.
माझ्या लाहनपणी द्राक्षे बीयांसहीत असायची. मोठीमोठी द्राक्षे आणि त्यात एखादे बी. चांगली टपोर्या जाम्भळाएवढी असायची द्राक्षे. सीडलेस द्राक्षे आली तेंव्हा ती या बीवाल्या द्राक्षांसमोर वामन बटु च दिसायची . आम्ही त्याना हिमगौरी च्या कथेतली सात बुटके म्हणायचो.
काही म्हणा द्राक्षे तेंव्हाही कधी आपल्या मातीतली वाटली नाहीत. ते फळ थोडे दुरावा राखुनच असते.फक्त थोड्या खस्ता खाउन वाळुन द्राक्षा बेदाणे होउन आल्या की त्या पाहुण्या वाटतात. थोडे जड जेवण झाले असावे . दुपारभर कोणीही छळायला येणार नसावे. हातात मस्त पैकी गुरुनाथ नाइक किंवा सुहास शिरवळकर कोणीतरी फुल्ल टाईमपास असे असावे . उजव्या हाताला गार वाळ्याच्या पाण्याचा पितळी लोटा. आणि डाव्या हाताला द्राक्षाचा घड .पुस्तकाचे पान उलटावे आणि द्राक्षाचा एकेक दाणा हळुच तोंडात जावा. काही वेळानन्तर अशी तन्द्री लागते ; डोळे या ईन्द्रियावर सिद्ध गुरुत्वकर्षण काम करत असते याची जाणीव होते डोळे सुस्तावतात. ब्र्हम्हानन्दी टाळी लागुनकेंव्हा झोप लागते तेच कळत नाही . दुपारी अडीच तीन ला डोळा लागतो तो सहा शिवाय उलगडत नाही. या दिवसात संध्याकाळे सहा वाजता देखील बर्यापैकी उजेड असतो . थोडेसे सकाळसारखे वातावरण असते त्यामुळे उजाडल्यासारखे वाटुन फसगत होते.
घरातले बाकी लोक हसायला लागले की कळते अरेच्च्या द्राक्षानी आपल्याला एप्रिल फूल केले की.....
द्राक्षे खाण्याची आणखी एक गंमत आहे. त्या घडातला एखादा सुट्टा मणी जो थोडासा मऊ झालेला असतो. एखादा जर्रा वाळलेला असतो. तोंडात टाकला की त्याला अशी जादुई चव आलेली असते सांगताच येत नाही. गोड आणि आंबट एकामागोमाग चव येतच रहाते.
द्राक्षाची ही तर्हा तर कलिंगडाची तर्हा आणखी वेगळीच . काही लोक त्याला टरबूज म्हणतात. म्हणु देत बिचारे पण कलिंगडाला टरबूज म्हणुन आपण त्याची बूज राखत नाही .
खरबूज , टरबूज , साखर काकडी, चिबूड हे सगळे एकाच वर्गातले विद्यार्थी.
प्रत्येकाचे काही वेगळे वैशिष्ठ्य. खरबूज कसे वाळूच्या सागरातुन थेट उचलून आणले आहे असे दिसते.खरबूजा चा मातकट सोनेरी रंग पटकन डोळ्यात भरत नाही. पण एकदा कापले की त्याच्या आतला गर्भरेशमी गाभा नजर बाजुला होउ देत नाही. खरबूजाचा करकरीत स्पर्श कडक कांजी केलेल्या खादीच्या नव्या लुगड्या सारखा करारी वाटतो.खरबूज जर गोल नसते तर ते बीकानेरच्या राजवाड्यातुन एखादे खांबावरचे शिल्प उचलुन आणले आहे असे भासले असते.
खरबूज पाहीले की मला रामनवमीची आठवण होते. लहानपणी आळीतल्या काळ्या रामाला रामनवमी ला रामनवरत्रात नऊ दिवस कार्यक्रमांची रेलचेल असायची. गीत रामायण ,प्रवचन , कीर्तन , रामरक्षा आणि सन्ध्याकाळी आरती. गावतले बरेच लोक रात्री आरतीला जमायचे. एरवी सामसूम असणार्या मन्दीरात त्या दिवसात एक प्रकारचे कसले तरी चैतन्य असायचे. आळीतले बरेचसे लोक बाहेर कोठेही गेले असले तरी रामनवमी चा उत्सवाला घरी यायचे.काही लोक गावात स्वत:चे घर नसले तर आळीतल्याच कोणाकडे तरी पाहुणे म्हणुन राहायचे.
एकमेकांची विचारपुस व्हायचे. कोण कोठे कोण कोठे आहे याची खबर बात मिळायची. जग हे एक ग्लोबल व्हीलेज आहे याची जाणीव व्हायची.
रात्री आरतीला सगळे एकत्र यायचे.आणि आपली आळी वसुधैव कुटुम्बकम आहे ही जाणीव मनात कोठेतरी घर करुन. आरती च्या नन्तर आफळे बुवांचे कीर्तन असायचे. ते नेताजी सुभाशचन्द्र बोस , रामदास , शिवाजी अशा विवीध विषयांवर कीर्तन करायचे.युवकाना प्रोत्साहन मिळेल अशा गोष्टी सांगायचे. कधी मोरोपन्तान्चे आख्यान ही लावायचे. आर्या दिन्ड्या साक्या यांचा अक्षरशः सुकाळ असायचा. रात्री बराच उशीरापर्यन्त कार्यक्रम चालायचे.कितीही झोप अनावर झालेली असली तरी आम्हा मुलाना मात्र नन्तर मिळणारा प्रसाद जाग्रुत ठेवायचा.
पपई , खरबूज , द्राक्षे , साखरकाकडी अशी नाना फळे त्या प्रसादात एकत्र झाले असायची. रामनवमी चा उत्साह जसा लोकाना जातपात वय ,हुद्दा सगळे विसरुन एकत्र आणयचा तसे हा प्रसादही. सर्व सामन्या पपई केळी मध्यम वर्गीय चिक्कु मखमली खरबूजा सोबत यायची. द्राक्षे त्या सगळ्या प्रसादातही अखंड राहुन आपले वेगळे आस्तित्व दाखवायची.
घरात सर्व प्रथम आणलेल्या खरबूजाला त्या रामाच्या प्रसादात वर्णी लागुन मान मिळायचा.
खरबूजाचे पन्हे हा एक अफलातुन प्रकार. साखर वेलदोडे घातलेले रेशमी भगव्या रंगाचे ते पन्हे तुमच्या मनात चाखताक्षणीच एक विलक्षण तृप्तीची जाणिव करुन देते. कितीही तळतळ्त्या उन्हातुन या एक वाटी पन्हे खा. जीव तृप्त होतो. जगातल्या कोणत्याही सॉफ्ट ड्रिन्क पेयाला ही सात्विक चव कधीच सापडणार नाही.
कलिंगडात हा सात्विक पणा जाउन एक बेरकीपणा आलेला असतो. वरुन काळेशार हिरवे कलिंगड आतुन भलतेच लाल असते. का कोणास ठाउक मला कलिंगड जुन्या चित्रपटातल्या शेट्ट्टीची आठवण करुन देते.स्वतः कलिंगड सुद्धा तसाच आब राखुन असते.
कलिंगड घरी आणण्याच्या दोन/तीन पद्धती आहेत्.एक म्हणजे कलिंगड थोडे कापुन म्हणजे चिर पाडुन आणायचे.फळवाला जणु खजिन्याच्या खोलीचे दार किलकिले करुन दाखवावे तसे आतला लाल खजिना हळुच दाखवतो.दुसरी पद्धत म्हणजे फळवाला कलिंगडाचा पिरॅमीड सारखा तुकडा कापतो तुम्हाला लाल भाग दाखवतो आणि जिग सॉ पझल असावे त्याप्रमाणे पुन्हा तो तुकडा जागेवर परफेक्ट बसवतो्आ तुकडा जे कापेल त्याला मिळायचा .तीसरी पद्धत म्हणजे आख्खे कलिंगड आणायचे न फोडता. फळवाल्या बागवानाकडुन माठ वाजवतो तसे वाजवुन आणयचे.लहानपणी घरात फ्रीज वगैरे काही नसायचे . ते आणलेले कलिंगड उन्हाने गरम झालेले असायचे.मग ते धप्पकन आंगणातल्या हौदात टाकायचे. जेवणे होइपर्यन्त ते हौदात गार करायलाठेवायचे.बाबांचे जेवण होइतो आम्ही भावंडे हौदात तरंगणार्या कलिंगडावर टपला मारत धबक धबक करत बसायचो. बाबा जेवण आटोपुन मागुन यायचे.आम्हाला एखादी टप्पल बसायची
आणि कलिंगड महाराज पाण्यातुन बाहेर यायचे.लहान बाळाला पुसावे तसे बाबा त्याला टॉवेलने पुसत. मोठे पातेले घेतले जाई.
परात घेतली जायची .कलिंगड परातीत स्थानपन्न व्हायचे. बाबा मग सुरीने कलिंगडाचे दोन भाग करायचे. आमचा डोळा त्या मधल्या स्पन्जा सारख्या गाभ्याकडे असायचे. बाबा तो तुकडा त्या दिवशी जो कोणी शहाण्यासारखा वागला असेल त्या भावंडाला द्यायचे.
बाहेरुन हिरवे गार दिसणारे कलिंगड आतुन एक वेगळेच रूप दाखवत असते. पाचुच्या तबकात एखदे माणीक चमकावे तसे हिरव्या पांढर्या जाड सालीच्या आत तो लाल भडक खजिना चमकत असतो.
एरव्ही हिरवा सिग्नल निघा . लाल सिग्नल थांबा . पिवळा केशरी सिग्नल थांबा वाट पाहुन जा असे आपल्याला शाळेत पाठ करुन घेतलेले असते. एप्रिल फळांच्या दुनियेत हे सगळे उलटे पालटे होउन जाते. आंब्याची राजवर्खी केशरी फोड पाहिल्यावर कोण कशाची आणि कशासाठी वाट बघेल? कलिंगडाचा लाल भडक गर पाहील्यावर थांबण्यापेक्षा तर उलट जोरात सुरु करा असेच त्याचे म्हणणे असते असे समजुन वागतात.
ही एप्रिल फळे खाण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते. द्राक्षे एकदम वीस्.तीस च्या संख्येने तोंडात बकणा भरली तर त्यांचा आतल्या आत बुकणा करायला मजा येते.
कलिंगडाचे करकरीत तुकडे काट्यावर धरुनते अगोदर ओठावर फिरवुन खायचे. अहाहा काय गार वाटते.
या कानापासुन त्या कानापर्यन्त पसरलेली आख्खी फोड खाताना लहान मुले तर नेहमीपेक्षा दुप्पट तिप्पट गोजिरवाणी वाटतात .
पपई एखाद्या साधु सारखी वैराग्य भावाने खाल्ली जाते. खरबूजाला पन्ह्याशिवाय स्वतन्त्र असे फारसे ओळखले जात नाही.
चिक्कु हे तसे फारसे मिजास नसलेले केळ्यानन्तर चे गरीब फळ.
काही फळे डोळ्याना सूख देतात्.काही जिभेला . अननसासारख्या काही फळांचा वासच मोहोवतो. तर अन्जीर खरबुजे सारख्या फळांचा स्पर्श पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटतो.
आंबा खाण्याची माझी सर्वात आवडती पद्धत सांगतो.
मस्त पैकी केशरी पिवळा दिसणारा राजवर्खी हापुस घ्यावा. त्याच्या तलम सालीचा स्पर्श अनुभवावा. त्याचा घमघमाट नाकापासुन फूटभर अन्तरावरुनही येत असतो .टोकाकडुन आंब्याचे साल दाताने सोलावी. आंब्याची साल पूर्ण काढुन टाकावी. खाण्या अगोदर डोळे बन्द करुन तो गुळगुळीत स्पर्श ओठानी अनुभवावा.आणि आता कशाचीही वाट न पहात बसता आंबा एकेक तुकडा तोंडात घोळवत सम्पवुन टाकावा. आहाहा त्या स्पर्शाने , राजेशाही वासाने , तलम स्पर्शाने ,राजवर्खी केशरी दर्शनाने आणि ताँडात घोळवत खालेल्ल्या स्वर्गीय चवीने मन एकदम तृप्त होते . मनात कोठेतरी स्वर्गीय संगीत ऐकु येउ लागते.अंतरात्म्यालाही तृप्तीचा साक्षात्कार होतो.
नाक कान डोळे स्पर्श आणि जीभ या पन्चेन्द्रीयना तृप्तीचा अनुभव देउन खाणार्याला श्रीमन्त करणारा आंबा हा खराखुर्रा सम्राट शोभतो..

No comments:

Post a Comment